27.85°C Pune
Thursday, May 9
image

बारणे यांनी काम केले नाही म्हणणाऱ्या विरोधकांना मतदारसंघच माहीत नाही - महेंद्र थोरवे


कर्जत, ता. १६ : खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काना-कोपऱ्यात काम केलेले असताना, त्यांनी कामच केले नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना हा मतदारसंघच माहित नाही, असे म्हणावे लागेल, असा प्रतिटोला कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सोमवारी (ता. १५) लगावला.


मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत-खालापूर मतदार संघाची महायुतीची समन्वय समिती बैठक कर्जत येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. 


बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, प्रदेश सहचिटणीस भरत भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमान पिंगळे, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड तसेच किरण ठाकरे, दीपक बेहेरे, नरेश पाटील, राजेश भगत, प्रवीण मोरे, विजय पाटील, भाई गायकर, शिवराम बदे, पंकज पाटील संभाजी जगताप, संदेश पाटील, राहुल डाळिंबकर, प्रमोद महाडिक, हिरामण गायकवाड, आठ सचिन कर्णूक, विजय सावंत, महेंद्र निगुडकर, जे. पी. पाटील, भगवान भोईर, सुधाकर घारे, भगवान चंचे, संतोष बैलमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


आमदार थोरवे म्हणाले, '' गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक विकास कामे केली आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचे चित्र बदलले आहे.'' 


संपूर्ण मतदारसंघात विरोधी पक्ष कोठेही दिसत नाही, असे सांगून बारणे म्हणाले, विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे सांगण्यासारखे काहीच नाही. ते केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवाराने मतदारसंघात केलेले एक तरी काम दाखवावे.


महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करताना स्वतःची काळजी घ्यावी. तापमान ४१ - ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. अशा परिस्थितीत दुपारी बाहेर पडणे टाळून सकाळी व संध्याकाळी प्रचारावर भर द्यावा, अशी सूचनाही बारणे यांनी पदाधिकाऱ्यांना केली. 


पंतप्रधान मोदी बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. राज्यातही जनतेच्या मनात असलेले ओळखून ते देण्याची क्षमता असलेले सरकार आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी आहे, असे आमदार ठाकूर म्हणाले.‌


हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर येऊन तेथील पवित्र माती डोक्याला लावणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मावळ मतदारसंघातला मावळा दिल्लीला गेलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन बाळासाहेब पाटील यांनी केले. 


शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र पाटील, नरेंद्र गायकवाड, भरत भगत आदींचीही यावेळी भाषणे झाली.

-----------