33.97°C Pune
Thursday, May 9
image

खोपोलीसाठी स्वतंत्र पाणी योजना, मेट्रोचे नियोजन - खासदार बारणे


खोपोली, ता. २६ : मावळ लोकसभा मतदारसंघात विकास झाला नाही, अशी टीका करणारे विरोधक डोळ्यांवर पट्टी बांधून बोलत आहेत, असा प्रतिटोला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी लगावला. खोपोली शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना तसेच मेट्रो आणण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असेही बारणे यांनी स्पष्ट केले.


खोपोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी ( ता. २५) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसुरकर, कर्जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख सुधाकर घारे, शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, खोपोली शहर अध्यक्ष मनीष यादव, ज्येष्ठ नेते बाबू पोटे, ॲड. अमोलराजे बांदल-पाटील, माजी नगरसेवक महादू जाधव, माजी नगरसेवक मंगेश दळवी, रमेश जाधव, खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव आदी उपस्थित होते.


खासदार बारणे म्हणाले, '' संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मतदारांकडे मते मागत आहोत. सकारात्मक कार्य करणाऱ्यांच्या मागे हा मतदार राहतो, असा अनुभव आहे. आपण नेहमीच माणसे जोडण्याचे काम केले आहे. कधीही कोणाला त्रास दिलेला नाही. विरोधकांची या मतदारसंघात ताकद कमी आहे. त्यामुळे ते विनाकारण टीका करीत आहेत. पण सूज्ञ मतदारांना वस्तुस्थिती माहीत आहे.'' 


खोपोली शहरात व परिसरात केलेल्या विकासकामांची माहिती खासदार बारणे यांनी यावेळी दिली. खोपोली शहरासाठी भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पाणी योजना सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात येईल. कर्जत- खोपोली लोहमार्ग, खोपोलीत मेट्रो सुविधा, मोठे अद्ययावत रुग्णालय आदी प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. 


मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आपल्याला सर्वप्रथम फोन आला. आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले. राष्ट्रवादीचे आपल्याला चांगले सहकार्य असून त्याची आपण नक्की परतफेड करू, अशी ग्वाही बारणे यांनी दिली. 


प्रास्ताविकात दत्तात्रय मसुरकर यांनी खोपोली शहराला आवश्यक असणाऱ्या विकासकामांबाबत अपेक्षा व्यक्त केली. जगदीश मरागजे यांनी सूत्रसंचालन केले.

--------------